दोन मित्र होते. एकाचं वय ८ वर्ष आणि दुसर्याचं १२ वर्ष. अगदी जीवाभावाचे मित्र. एकाच गावात रहायचे. एकाच शाळेत होते. एका वर्गात नसले तरी सगळीकडे एकत्रच हिंडायचे. गावाला त्यांच्या मैत्रीचं कौतुक होतं. एकदा जवळच्या एका रानात ते हिंडायला गेले. रोजच जायचे, तसे आजही गेले. खुप धम्माल केली. खुप खेळले. थकवा जाणवल्यामुळे त्यांना तहान लागली. बाजूलाच विहिर होती. त्या विहिरीत क्वचितच कुणी पाणी भरायला येत. आता गावातल्या लोकांच्या घरी नळ आले. म्हणून विहिरीवर जाण्याचा योग क्वचितच येतो. ७ वर्षांचा मुलगा फारच थकला होता. १२ वर्षाच्या मुलानं म्हटलं "थांब मी तुझ्यासाठी विहिरीतून पाणी काढतो." पाणी काढण्यासाठी तो रीकामी बादली उचलायला गेला आणि इतक्यात त्याचा तोल गेला. बादली वर राहिली आणि मुलगा विहिरीत. ७ वर्षाचा मुलगा घाबरला, त्याने आधी आरडा ओरडा करुन कुणी मदतीला येतंय का हे पाहिलं. पण कुणीच आलं नाही. १२ वर्षाचा मुलगा पाण्यात तडफत होता. स्वतःला वाचवण्यासाठी हात मारत होता. लगेच ७ वर्षाच्या मुलानं बादली विहिरीत टाकली. १२ वर्षाच्या मुलानं ती धरली व हळू हळू ७ वर्षाचा मुलगा दोरीने बादली खेचू लागला. १२ वर्षाच्या मुलाचं वजन फार होतं. बादली खेचताना ७ वर्षाच्या मुलाच्या नाकी नऊ आले होते. पण त्याच्या अंतरआत्म्याने ठरलवं होतं आपल्या मित्राला वाचवायचंच. अखेर त्याने आपल्या मित्राला सुखरुप बाहेर काढलं. दोघांच्याही जीवात जीव आला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि मनसोक्त रडले. गावात आल्यावर सर्वांना ही गोष्ट सांगितली. पण कुणाचा विश्वासच बसेना. कारण ७ वर्षाचा चिमुरडा १२ वर्षाच्या मुलाचं वजन पेलवू शकत नाही. त्यांची ही गोष्ट सर्व गावभर पसरली. काही गाववाल्यांना वाटलं मुलं खोटं बोलत आहेत, काहींना वाटलं चेटूक वगैरे असावं. गावात एक वृद्ध व्यक्ती राहत होते. रामूकाका त्यांचं नाव. गाववाल्यांनी रात्री रामूकाकांची भेट घेतली. मुलंही सोबत होते. एका जबाबदार गाववाल्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली व म्हणाला ७ वर्षाचा मुलगा १२ वर्षाच्या मुलाला विहिरीतून बाहेर कसं काढू शकतो. त्यात ७ वर्षाचा मुलगा हा सडपातळ आणि १२ वर्षाचा मुलगा शरीराने बर्यापैकी सुदृढ. त्यामुळे सर्व गाववाले म्हणाले हे अशक्य आहे. आता ही काही बाहेरची बाधा आहे का? हे तुम्ही पहा. रामूकाकांनी दोन्ही मुलांकडे पाहिलं आणि स्मीत हास्य करत मुलंना जवळ बोलावलं व गाववाल्यांकडे पाहून रामूकाका म्हणाले "का नाही शक्य?" "अहो अशक्यच आहे", एका गाववाल्याने पुन्हा नायरीचा सूर लावला. रामूकाका म्हणाले "हे अगदी शक्य आहे. या छोट्या मुलाने मोठ्या मुलाचे प्राण वाचवले आहे. हे त्याला शक्य झालं कारण तू हे करु शकत नाही, असं सांगणारं तिथे कुणीच नव्हतं." गाववाले एकमेकांच्या चेहर्याकडे पाहू लागले. रामूकाका पुढे म्हणाले "एवढंच नाही तर या छोट्या मुलानेही मी हे करु शकत नाही, असं स्वतःला सांगितलं नाही" रामूकाकांना काय म्हणायचं होतं, हे गाववाल्यांना कळून चुकलं...
तात्पर्य : आपण एखादी चांगली गोष्ट करायला जातो, तेव्हा अनेक नकारात्मक प्रवृत्तीचे लोक येतात आणि ती गोष्ट तुम्ही का करु नये याचा पाढाच वाचतात. म्हणून अशा लोकांपासून शक्यतो लांब रहावं. ही माणसं दुःखी असतात. यांच्या भूतकाळात घडलेल्या वाईट घटना यांना विसरता येत नाही आणि मग आपला नकारात्मक अनुभव सांगण्यात मशगूल होतात. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. ज्यांना आपण ईश्वराचा अवतार मानतो त्या राम-कृष्णालाही दुःखांनी सोडलं नाही. तर आपण कोण? म्हणून नेहमी सकारात्मक विचार करायचा. या ७ वर्षाच्या मुलाला अंतर्नाद ऐकू आला की मी हे करु शकतो आणि त्यानं केलं. तुम्ही सुद्धा तुमच्या मनाशी सकारात्मकतेने संवाद साधा. तुम्हालाही अंतरनाद ऐकू येईल, मी हे करु शकतो आणि तुम्ही नक्की कराल...